दलित पँथर ही चळवळ क्रांतीची प्रेरणा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची अखंड उर्जास्त्रोत आहे. मात्र दलित पँथर स्थापन झाल्यानंतर कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी यावरून अवघ्या 2 वर्षांत दलित पँथरमध्ये फूट पडली. जर पँथरमध्ये फूट पडली नसती तर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे असते. दलित पँथरने राज्यात सत्ता काबीज केली असती. असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे दलित पँथर्सच्या कार्यकर्त्यांचा आणि दिवंगत झालेल्या पँथर कार्यकर्त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास आठवले बोलत होते.
ते म्हणाले की, राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केली. त्यानंतर दलित पँथर आम्ही भारतीय दलित पँथरच्या रूपाने टिकविली. दलित पँथर बरखास्त झाल्यानंतर भारतीय दलित पँथर ने 1977 ते 1989 पर्यंत दलित पँथर ची चळवळ टिकविली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा लढा, गायरान जमिनी, भूमिहीनांचे प्रश्न, झोपडपट्टीचे प्रश्न, मंडल आयोग दलित अत्याचार विरोध आदी विषयांवर भारतीय दलित पँथरने आंदोलने उभारली. भारतीय दलित पँथरची चळवळ वाढत होती.
रिपब्लिकन ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर इच्छा नसताना ऐक्यासाठी बरखास्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही आता देशभर पोहोचविला आहे.काही लोक रिपब्लिकन नाव पुसू पाहत आहेत. आम्ही मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन संकल्पना कधीही पुसू देणार नाही असे प्रतिपादनही रामदास आठवले यांनी केले.
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री दिवंगत नामदेव ढसाळ यांचे पुणे येथील गावात आणि दलित पँथरचे संस्थापक दिवंगत राजा ढाले यांच्या सांगलीतील नांद्री गावात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून 10 कोटी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार अशी घोषणाही मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सुखदेव सोनवणे, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, रिपाइंचे पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण, यशवंत नडगम, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पँथर नेते गंगाधर आंबेडकर, रोहिदास गायकवाड, आदींचा सत्कार करण्यात आला.