एक तप उलटले, अन् वाघ झाले दुप्पट

एक तप उलटले, अन् वाघ झाले दुप्पट

देशात वाघांची संख्या दुप्पट होण्यासाठी तब्बल एक तप म्हणजे १२ वर्षांचा कालावधी गेला आहे. जागतिक वाघ दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलेल्या वाघांच्या संख्येच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. भारतात सद्यस्थितीला जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघांची संख्या आहे. जगभरात असलेल्या टागर रेंजच्या १३ देशांच्या बरोबरीलाच आपण व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे काम करत आहोत असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

भारतात १९७३ मध्ये अवघे ९ व्याघ्र प्रकल्प होते, पण आता व्याघ्र प्रकल्पाची संख्या ही आता ५० वर गेलेली आहे. महत्वाच म्हणजे चांगली ते सर्वोत्तम अशी व्यवस्था या सगळ्या व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी आहे. भारतात वाघांसाठीचे २०१८ साली सर्वेक्षण झाले होते. त्यामध्ये वाघांची संख्या ही २३६७ असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. भारत सरकारने मांडलेल्या अंदाजानुसार हा आकडा जैसे आहे. सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेशात आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकचा समावेश आहे. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाघांच्या संख्येचा अहवाल जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये वाघांची संख्याही २९६७ इतकीच होती. याआधीच्या २००६ साली असलेल्या १४११ या वाघांच्या संख्येच्या तुलनेत २०१९ मध्ये वाघांची संख्या ही २९६७ म्हणजे दुप्पट झाली आहे.

जगभरातील देशांकडे असणाऱ्या क्षेत्राच्या तुलनेत भारताकडे २.५ टक्के क्षेत्र आहे. तर जागतिक पातळीवर तुलना केल्यास भारतात पर्जन्यमानाचे प्रमाण अवघे ४ टक्के आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारतात १६ टक्के इतकी लोकसंख्या आहे. जैवविविधतता ही भारतात ८ टक्के इतकी आहे. जागतिक वाघांच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारतात वाघांची संख्या ७० टक्के इतकी आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांची संख्या ही १९२३ इतकी म्हणजे ६५ टक्के इतकी आहे. तर भारतात असणाऱ्या ५० व्याघ्रप्रकल्पापैकी भारतात ३ व्याघ्रप्रकल्पात वाघच नाहीत ही स्थिती आहे. त्यामध्ये मिझोरमचा डंपा व्याघ्रप्रकल्प, पश्चिम बंगालचा बुक्सा व्याघ्रप्रकल्प आणि झारखंडचा पालामाऊ व्याघ्रप्रकल्प या व्याघ्रप्रकल्पात एकही वाघ उरलेला नाही.

First Published on: July 28, 2020 7:00 PM
Exit mobile version