मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, विरोधक यावर टीका करत आहेत. विरोधकांकडून सातत्यानं मुंबईवर होत असलेल्या टीकेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर घरी परतलेल्या आव्हाड यांनी “मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम केलं जात आहे,” असा आरोप केला आहे. मुंबईला पद्धतशीरपणे बदनाम केलं जात आहे, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.
कोरोना महामारीमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई मागील दीड महिन्यांपासून ठप्प आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२ हजारांच्या वर पोहोचली असून, रुग्णांची संख्या वाढतच आहे. केंद्र सरकारनेही मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे मात्र कोरोनाच्या संकटात राजकारण करु नका अस सांगत राजकारण केलं जात आहे. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईचा लचका तोंडण्यासाठी लोक टपून बसले असून त्यांचं घर शेजारीच आहे म्हणत अप्रत्यक्षपणे गुजरातला टोला लगवाला.
हेही वाचा – बॉईज लॉकर रूम प्रकरणात ट्विस्ट; मुलीने ‘सिद्धार्थ’ नावाचं प्रोफाइल तयार केलं आणि…
आव्हाड यांनी ट्विट करून मुंबईतील स्थितीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोपांवर मौन सोडलं आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय. मुंबईचा लचका तोंडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे.#आमची_मुंबई
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 11, 2020