कन्नड पोलिसांची दडपशाही, ठाकरे गटाची ‘मशाल फेरी’ रोखल्याने शिवसैनिक संतप्त

कन्नड पोलिसांची दडपशाही, ठाकरे गटाची ‘मशाल फेरी’ रोखल्याने शिवसैनिक संतप्त

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागात 1नोव्हेंबर 2022 हा दिवस मराठी बांधव काळा दिवस म्हणून पाळत आहेत. या ‘काळा दिन’ला समर्थन देण्यासाठी काल कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मशाल फेरी काढण्यात होती. ही मशाल फेरी बेळगावच्या दिशेने जात असताना कन्नड पोलिसांनी शिवसैनिकांवर दडपशाही केली आणि कर्नाटक वेशीवर असलेल्या दूधसागर पुलावर शिवसैनिकांना अडविले. त्यामुळेच संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करत पुणे – बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. ”बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे”, ‘बेळगाव, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’ अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. (Kannada Police Suppression, Shiv Sainiks Angry Over Blocking Thackeray Group’s ‘Mashal Pheri’)

शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे पुणे – बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. शिवसेना झिंदाबाद आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा घेऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
दरवर्षी 1 नोव्हेंबर म्हणजेच कर्नाटक राज्य स्थापनेच्या दिवशी या सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. काळे कपडे परिधान करून आणि हातात काळे झेंडे धरून मूक सायकलफेरी सुद्धा काढण्यात येते. यावर्षीही शिवसैनिकांतर्फे काळा दिन पाळण्यात आला. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी मशाल फेरी काढली होती. राजर्षी छत्रपत्री शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाच्या स्थळी जाऊन वंदन करून ही मशाल फेरी बेळगावच्या दिशेने निघाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण कर्नाटक पोलिसांनी या मशाल फेरीला अडविले.

सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या मागे शिवसैनिक
लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा हा अवमान आहे. मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारने अत्याचार केले आहेत. असे असूनही मराठी भाषिक जनता आपल्या जीवाची पर्वा न करता लोकशाहीच्या मार्गाने लढा देत असून त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक उभे आहेत, असे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय दिवाण म्हणाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
मशाल फेरी अडविल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विशेषत: सीमाभागात पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


हे ही वाचा – मोरबीची घटना ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड ‘ म्हणावी का? ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल

First Published on: November 1, 2022 10:35 AM
Exit mobile version