परीक्षा आठवड्यावर, तरी प्रश्नसंच नाही एलएलबीचे विद्यार्थी चिंतेत

परीक्षा आठवड्यावर, तरी प्रश्नसंच नाही एलएलबीचे विद्यार्थी चिंतेत

एलएलएम परीक्षा लांबणीवर पडूनही त्याचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळाले नाही. अशातच एलएलबीच्या सत्र ४च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने १८ मेपासून सुरू होत असून अद्यापही विद्यार्थ्यांना प्रश्नसंच मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होतील, असे एकमत कुलगुरूंच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले, मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये याकरिता परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले. त्याप्रमाणे एलएलबी परीक्षा १८ मेपासून ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. एलएलबीच्या याआधीच्या तिन्ही सत्रांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे हे सत्रही ऑनलाईन पद्धतीने घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थी करीत होते, मात्र परीक्षा नियोजित पद्धतीने होतील हे विद्यापीठाने स्पष्ट केल्यानंतर किमान विद्यापीठाकडून प्रश्नसंच देणे अपेक्षित असल्याचे मत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

ऑफलाईन परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेत किमान एका दिवसाचा गॅप असावा, विद्यार्थ्यांना १५ मिनिटे वेळ जास्त दिला जावा तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले जावेत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठानेही तसे परिपत्रक जाहीर केले आहे, मात्र त्यानंतर १८ मेपासून सुरू होणार्‍या विधी परीक्षांसाठी प्रश्नसंच देण्यास परीक्षा विभाग विसरला की काय, असा प्रश्न स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनी केला आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सतत येणार्‍या अडचणींकडे विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा विभाग दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नसंच देऊन त्यांना मदत करावी, अशी मागणी पवार यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केली आहे.

First Published on: May 10, 2022 5:00 AM
Exit mobile version