मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून शिवसेनेने पुन्हा फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. (lok sabha 2024 congress balasaheb thorat and vijay wadettiwar on sangli lok sabha)
महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
“शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी, सांगली या पारंपरिक आमच्या जागा आहेत. मुंबईत एक जागा दिलेली आहे. आणखी एक जागा द्यावा आमची अपेक्षा आहे. मात्र तसं न करता आघाडी धर्म पाळला नाही त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही. या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत. दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे.या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाविकास आघाडी म्हणून जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथील उमेदवारही जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित… pic.twitter.com/31BUINvn8Q
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 27, 2024
महाविकास आघाडीचे जागावाटपबाबत चर्चा सुरू असताना श्री.उद्धवजी ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार घोषित केले. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले आहे. उद्धवजी ठाकरे यांनी दोन्ही जागेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा.
तसेच वंचित बहुजन आघाडीने… pic.twitter.com/exSsyQIIXp
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 27, 2024
हेही वाचा – Lok Sabha : शाहू महाराजांमुळे वाद न घालता कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली – संजय राऊत