सिंधुदुर्ग : यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. कारण दोन कट्टर विरोधक या मतदारसंघातून एकमेकांच्या समोर आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून मविआने ठाकरे गटातर्फे विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने भाजपातर्फे नारायण राणे उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे आता राणे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपला प्रचार करताना राजापूरमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांची भेट घेतली. ज्यानंतर कोकणातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. पण या भेटीबाबत आता कदम यांच्याकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यानी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम केले आहे. (Lok Sabha Election 2024 Ganapat Kadam explanation on meeting Narayan Rane)
हेही वाचा… Manoj Jarange : मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, जरांगेंचे समाजाला आवाहन
राजापूरमध्ये माजी आमदार गणपत कदम यांची नारायण राणे यांनी भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात देखील विविध चर्चा रंगल्या. या चर्चांना आता पूर्णविराम देण्यासाठी गणपत कदम म्हणाले की, मिडीयाने अर्धसत्य दाखवल्यामुळे मी व्यथीत झालो आहे. मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, असे मी नारायण राणेंना सांगितले होते. परंतु तरीही ते आले आणि मग माझाही नाईलाज झाला. निवडणुकीत मतदान करून उपकाराची परतफेड करणे हे माझ्या तत्वात बसत नाही, कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.
तर, मैत्री जपलीत त्याबद्दल धन्यवाद. पण मी माझे मतदान तुम्हाला देणार नाही. हे माझे त्यांना वाक्य होते. मतदान मी स्वतः तुम्हाला करणार किंवा आणखी कोणाचा प्रचार करणार, राणेंना मत टाकणार हे कधीही माझ्या तोंडातून आलेले नाही आणि येणार पण नाही. परंतु दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहे, असे चित्र मिडीयाने रंगवले त्यामुळे दुःख झाले, अशी खंत यावेळी गणपत कदम यांनी बोलून दाखवली. पण त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे ते ठाकरे गटालाच पाठिंबा देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
Edited By : Poonam Khadtale