मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर, सातारा आणि पुण्यातील प्रचारसभेतून काँग्रेस विरोधी रडगाणे गायले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार गुजरातला पळवून नेले, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना मोदींना फक्त गुजरात आठवला. आज पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली असून महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (ता. 29 एप्रिल) केली. (Lok Sabha Election 2024 Nana Patole criticism of PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदी यांनी आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा घेतली. या सभांमधून मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. या टीकेचा नाना पटोले यांनी आज समाचार घेतला. नरेंद्र मोदी धादांत खोटे बोलत आहेत. खोटे बोलण्यात नरेंद्र मोदींचा कोणी हात धरू शकत नाही. काँग्रेस पक्ष आरक्षण संपवत आहे, हा मोदी यांचा आरोप अत्यंत चुकीचा आणि हास्यास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर लोकशाही व्यवस्था, संविधान तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनता, एससी, एसटी, मागासवर्गीयांना हक्क आणि अधिकारासह आरक्षणही दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाचा पहिल्या पासूनच विरोध आहे, असा आरोप यावेळी पटोलेंकडून करण्यात आला.
मागील 10 वर्षात धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो, म्हणून त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजपावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचे पाप ह्याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने केले आहे. 400 जागा जिंकल्या की आरक्षण बदलू असे जाहीर सांगणारे मोदींचे खासदार आणि मंत्रीच आहेत. पण जनता भाजपाला घरी बसवणार याची जाणीव होताच मोदींनी भाषा बदलली. आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. संधी मिळाली तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे स्पष्ट आहे, असे पटोलेंकडून सांगण्यात आले.
काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान केला हे आणखी एक असत्य आणि खोटारडे विधान नरेंद्र मोदी करत आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनच्या पायाभरणी कार्यक्रमाला मोदी यांनी बोलावले नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत म्हणून हा त्यांचा अपमान नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.
भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपाला फक्त मतांसाठी हवे आहेत. निवडणुका आल्या की छत्रपतींचे नाव घेता आणि नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपाची निती आहे. नरेंद्र मोदी पाच वर्षात सोलापुरात पाचवेळा आले, पण पाच लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत, अशी जळजळीत टीका पटोले यांनी केली.
Edited By : Poonam khadtale