मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या गोष्टींचा उल्लेख केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल, शुक्रवारी 2019मधील सकाळच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर ठपका ठेवतानाच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे.
सन 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला शिवेसना आणि भाजपा एकत्रितपणे सामोरे गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये बिनसले. त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी वारंवार केला. यासाठी त्यांनी तुळजाभवानी आणि पोहरादेवीची शपथ घेऊन अमित शहा यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द पाळला नसल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : अमित शहा अध्यक्ष बनल्यावर भाजपाची चाल बदलली, उद्धव ठाकरेंचा दावा
भाजपाने अर्थातच भाजपाने त्याचा इन्कार केला. असा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असे खुद्द अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावेळी झालेल्या प्रचारसभांमध्ये तसा उल्लेख केला असता, असे स्पष्टीकरणही भाजपाकडून देण्यात आले. मात्र, उद्धव ठाकरे आजही ठाम आहेत. एवढेच नव्हे तर, 2014मध्ये मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा जणू स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटले. पण अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाची भूमिका बदलली आणि शिवसेनेबरोबरची युती तुटल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनीही त्याबाबतचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. त्यानुसार, प्रत्येकी 2.5 वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल, याबद्दल अमित शहा यांच्यासमवेत सहमती झाली होती. शिवाय देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन. पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा – Maharashtra politics : भाजपासोबत जाण्यास सहमत नव्हतो अन् नाही, शरद पवारांचा पुनरुच्चार