धाराशिव : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा आजारी होते मी नियमितपणे रश्मी ठाकरे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रिया करण्याबाबत माझ्याकडून सल्ला घेतला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर टीकास्त्र सोडले आहेत. ते आज महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथील सभेला संबोधित करत होते. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticizes Prime Minister Narendra Modi)
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी धाराशिवकरांच्या प्रेमाने आज भारावून गेलो आहे. मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलो आहे. दिल्लीश्वरांना वाटतं की, उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत. मात्र, तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. 7 तारखेनंतर ओमराजे निंबाळकर यांना बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला घेऊन जाणार आहे. तुम्ही सर्वजण दिल्लीच्या हुकुमशाहांचे तख्त जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे. त्यामुळे मी याठिकाणी मत माघायला आलो आहे, 400 जागांचे जुगाड लावायला नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. अमित शाह यांचे गुप्तहेर इकडे तिकडे फिरत असतात. पण मी त्यांना सांगतो, आमच्याकडे गुप्त असे काही नाही. आमच्याकडे उघडा बाजार असतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
हेही वाचा – Raj Thackeray : सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर…; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
मोदींवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परवा एक मुलाखत दिली. त्यानंतर मला अनेकांनी मेसेज केले आणि विचारले मोदींना तुमच्यावर इतके प्रेम कसे आले. मीही त्यांना म्हटलं, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र, मोदींचे प्रेम एवढे उतू गेलं आहे की, ते म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम, अस्था आहे. मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माजी विचारपूस करायचे. मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उपमुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) माहिती नव्हतं का? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
माझ्या आजारपणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार (एकनाथ शिंदे) रात्री गाठीभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे हे ठरवत होते. मग हे पंतप्रधान मोदी तुम्हाला माहिती नव्हतं का? आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांच्यावर कधी काही संकट आले तर मी धावून जाईल. मग पंतप्रधान मोदींवरही संकट आलं तर मीदेखील धावून जाईल. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट म्हणून आलात त्यावर आवर घाला. शिवसेना आणि भाजपाची युती तोडली तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं का, उद्धव ठाकरे कोण आहेत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे.
Edited By – Rohit Patil