धाराशिव : लोकसभा निवडणुकींचा प्रचार हा आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हे आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) देशासह राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही, असा टोलात पवारांनी लगावला आहे. (Lok Sabha Election2024 Sharad Pawar sharp reply to Devendra Fadnavis criticism)
आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धाराशिव येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. बुधवारी (ता. 24 एप्रिल) अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका करत म्हटले की, “पवारांनी किती कोलांट्या उड्या मारल्या, याचे व्हिडीओ दाखवले, तर अवघड होईल” असा टोला लगावला.
त्यांच्या या टोल्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही. आपला पराभव होतोय हे आता भाजपाच्या लक्षात आले आहे. मोदींचे भाषण बघा, अमित शाहांचे भाषण ऐका, सगळ्यात माझ्यावर टीका असते. उद्धव ठाकरेंवर टीका असते. भाजपाला त्यांचा पराभव आता स्पष्टपणे दिसतोय, असा पलटवार शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.
मोदी असोत किंवा अमित शहा अथवा इतर कोणी, त्यांच्या भाषणात सतत फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका असते. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही सत्तेवर आहात. त्या काळात तुम्ही काय केले? त्याचा लेखाजोगा आधी लोकांसमोर मांडा, उगीच मागच्या गोष्टी काढू नका, असेही पवारांकडून सुनावण्यात आले. त्यांच्याकडे मांडायला काही नाहीच, लोकांना सांगायला काही नाही म्हणून ते असे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे दुसरे काही उद्योगही नाहीत, अशी टीका शरद पवारांनी करत भाजपावर हल्लाबोल केला.
शरद पवारांनी ऐकवली मोदींची ऑडिओ…
बुधवारी (ता. 24 एप्रिल) माढ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ऑडिओ ऐकवली. या ऑडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ऐकू येत आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण झाले, पण ते महागाईवर म देखील बोलले नाही, असे मोदींकडून सांगण्यात आले. गॅसचे दर वाढल्याने पोरांना खायला अन्न नाही, ज्यामुळे त्यांच्या आया रडत आहेत, त्यामुळे मतदान करायला जाताना घरातील गॅस सिलिंडरसमोर हात जोडा, असे मोदींनी त्यावेळी नागरिकांना सांगितल्याची ऑडिओ क्लीप शरद पवारांकडून आजच्या सभेत ऐकविण्यात आली. ज्यानंतर आता फडणवीस वि. पवार असा वाद सुरू झाला आहे.
हेही वाचा… Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली, म्हणाले…
Edited By : Poonam Khadtale