युतीत मिठाचा खडा!

युतीत मिठाचा खडा!

Shivsena Bjp

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने आपले मूळ रंग दाखवायला आता सुरुवात केली आहे. १८ खासदार असतानाही शिवसेनेला बिन महत्वाचे अवजड खाते केंद्रात देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५० असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र मित्र पक्षांसाठी सोडलेल्या १८ जागा या भाजपच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात, असे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युती झाली ती विधानसभा निवडणुकीत ५०-५० या फॉर्म्युल्यावर. म्हणजे एकूण २८८ पैकी भाजप १४४ आणि शिवसेना १४४ जागा लढेल या अटीवर. मात्र निकाल लागल्यानंतर आणि केंद्रात नवे मंत्रिमंडळ आल्यानंतर भाजपने आपले रंग दाखवायला सुरुवात केली.

रविवारी औरंगाबादला बोलताना त्यांनी १३५-१३५ असा फॉर्म्युला असल्याचे जाहीर केले होते आणि उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना देण्याचे ठरवले होते. मात्र दोन दिवसात आपला निर्णय फिरवताना पाटील यांनी १८ जागा मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर लढवतील, असे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

नव्या फॉर्म्युल्यामुळे युती तुटेल का, याविषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी असे काही होणार नाही. आमची युती अभेद्य आहे, असा सूर लावला. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली त्याला भाजप नेते एकनाथ खडसे कारणीभूत ठरले होते. यावेळी चंद्रकांतदादा यांना पुढे करून आणि ठराविक अंतराने वादग्रस्त वक्तव्य करायला लावून शेवटी युती तोडायची, ही शक्कल भाजप लढवत तर नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

First Published on: June 5, 2019 4:30 AM
Exit mobile version