एकच लक्ष्य; धुळ्यात सुभाष भामरेंचा पराभव – अनिल गोटे

एकच लक्ष्य; धुळ्यात सुभाष भामरेंचा पराभव – अनिल गोटे

आमदार अनिल गोटे

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच धुळे महापालिका निवडणुकांमधून भाजपाने आमदार अनिल गोटे यांना डावलल्याने ते नाराज होऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यात भाजप उमेदवाराचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल गोटे यांनी विरोधी भूनिका घेतल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप पक्षात मोठा भ्रष्टाचार

धुळ्यात भाजप पक्षात मोठा भ्रष्टाचार, अनागोंदी माजली असून पक्षातील ही घाण आपल्याला साफ करायची आहे. सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा याठिकाणी पराभव करणे हे एकमात्र लक्ष्य असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे.

पवार कशी मदत करतील तो त्यांचा निर्णय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझी भूमिका सांगण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांना कशी मदत करायची हा त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

तेलगीचा मित्र

राष्ट्रवादी आणि अनिल गोटे यांच्यात तेलगी प्रकरणानं वाद झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल गोटे यांचा ‘तेलगीचा मित्र’ म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने देखील पाहिला होता. मात्र शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने अनिल गोटे वैर विसरुन शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

असा आहे भाजप-अनिल यातील वाद

आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महापालिका निवडणुकांमधून डावलल्याने त्यांनी नव्या ‘लोकसंग्राम’ पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी ‘लोकसंग्राम’ या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष ५७ असे ५९ उमेदवार उभे केले होते. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आले असून त्यांच्या मुलाचा तेजस गोटेचा पराभव झाल आहे.


वाचा – लोकांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशीनने भाजपाला केलं – अनिल गोटे

वाचा – अनिल गोटेंचा लेटर बॉम्ब


 

First Published on: March 20, 2019 12:02 PM
Exit mobile version