Maharashtra Budget Session : मंत्र्यांच्या बंगल्यांचा खर्च वादात, रोहित पवार-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी

Maharashtra Budget Session : मंत्र्यांच्या बंगल्यांचा खर्च वादात, रोहित पवार-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी

रोहित पवार-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. 27 फेब्रुवारी) विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंल्पावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. याचवेळी त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात दिली. यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेप घेत रोहित पवारांना सुनावले. तर रोहित पवारांनीही आक्रमकपणे गुलाबराव पाटलांना उत्तर दिले. (Maharashtra Budget Session: Clash between Rohit Pawar-Gulabrao PatIl over cost of Minister’s bungalows)

हेही वाचा… Jayant Patil : अजित पवारांना फुले-शाहू-आंबेडकरांचा विसर पडला, जयंत पाटलांनी साधला निशाणा

अर्थसंकल्पावर चर्चा करत असतानाच रोहित पवार म्हणाले की, कोणताही अर्थमंत्री असेल तर भाषण हे चांगलेच होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर दोन-तीन दिवस चर्चा करण्यात येते. पण त्या चर्चेवर काम करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चार-पाच महिन्यांपूर्वी मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्या बंगल्यात खरच मंत्री राहतात का? हे पाहणे गरजेचे आहे. कारण मंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात. पण आजचे मंत्री हे केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित मंत्री आहेत, असा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.

राज्याचा निर्णय घ्यायचा असेल तर मंत्र्यांना मुंबईत राहणे, मंत्रालयात राहणे आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. पण काहीही होत नसताना मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटींचा आता आणि काही महिन्यांपूर्वी 30 कोटींचा म्हणजे एकूण 60 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर मंत्र्यांच्या बंगल्यातील चहापाण्यावर 5 कोटी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती रोहित पवारांनी देताच यांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. तर याबाबत मंत्री गुलाबराव पाटील बोलण्यास उभे राहिले असता या मुद्द्यावर अर्थमंत्री उत्तर देण्यासाठी उपस्थित आहेत, असे रोहित पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

परंतु, रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनर आक्षेप घेत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही आजपर्यंत सर्वांची भाषणे ऐकली. पण 30 कोटी कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करण्यात आले, त्या मंत्र्यांचे नाव घ्यावे. पण सभागृहात चुकीची माहिती देऊ नये, अशी विनंती पाटलांनी केली. ज्यानंतर सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च करण्यात आलेली रक्कम ही 30 कोटी असल्याचे रोहित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले. ज्यामुळे या मुद्द्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

First Published on: February 29, 2024 7:22 PM
Exit mobile version