मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमले ३४२ कोटी, कोविड आरोग्य सुविधेवर फक्त २३.८२ कोटी खर्च!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमले ३४२ कोटी, कोविड आरोग्य सुविधेवर फक्त २३.८२ कोटी खर्च!

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, या संकटाच्या काळात राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे आले आहेत. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने ३४२ कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ २३.८२ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिली आहे. याव्यतिरिक्त परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी सर्वाधिक ५५.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि ८० लाख रुपये औरंगाबाद रेल्वेतील अपघातग्रस्तांना देण्यात आले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील मागविला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम आणि वाटपाची माहिती दिली. १८ मे २०२० पर्यंत एकूण ३४२.०१ कोटी रुपये जमा झाले आहेत. या रकमेमधून एकूण ७९,८२,३७,०७० रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी केवळ २३,८२,५०,००० रुपये कोविड १९ वर खर्च झाले आहेत. त्यापैकी २० कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून, ३,८२,५०,००० रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत.

प्रवासी मजुरांना देण्यात आलेली रक्कम राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. जेणेकरून रेल्वेचे भाडे वेळेवर देता येईल. यामध्ये ३६ जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे, ५३,४५,४७,०७० रुपये इतके आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वेचे भाडे १.३० कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वे भाडे ४४.४० लाख रुपये आहे. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील मजुराला प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे १६ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ८० लाख रुपयांची आर्थिक मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यातून देण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र सरकारने कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ ७ टक्के रक्कम ही आरोग्य सेवांवर खर्च केलेली आहे. प्रवासी कामगारांच्या रेल्वे तिकिटावर १६ टक्के आणि रेल्वे अपघातग्रस्तांवर ०.२३ टक्के रक्कम खर्च केली आहे. दरम्यान आजही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये २६२.२८ कोटी रुपये शिल्लक आहेत.

दरम्यान, अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, पालिका आणि सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी जर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये जमा झालेली रक्कम खर्च केली गेली तर त्यांचा निधी योग्य कामात वापरल्याचा निश्चितपणे देणगीदारांना दिलासा मिळेल.

First Published on: May 31, 2020 7:55 PM
Exit mobile version