महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बाधितांचा आकडा काहीसा वाढला, पण मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी राज्यात १६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर शनिवारी १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख २६ हजार ८५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
८ हजार १७२ नव्या बाधितांची नोंद
मृतांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोनाबाधितांचा आकडा मात्र काहीसा वाढलेला दिसला. शुक्रवारी राज्यात ७ हजार ७६१ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर शनिवारी ८ हजार १७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ लाख ०५ हजार १९० झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०० हजार ४२९ इतकी झाली आहे.
८ हजार ९५० रुग्ण कोरोनातून बरे
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसली. शुक्रवारी १३ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले होते. तर आज राज्यात ८ हजार ९५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२८ टक्के एवढे झाले आहे.