अलमट्टी विसर्ग आत्ताच कसा वाढवता येईल त्यासाठीचा प्रयत्न गरजेचा – फडणवीस

अलमट्टी विसर्ग आत्ताच कसा वाढवता येईल त्यासाठीचा प्रयत्न गरजेचा – फडणवीस

कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे. कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी  कोल्हापूर, सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल याचा प्रयत्न करावा, असे फडणवीस यांनी सूचवले  आहे.

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारे संकट पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. गेल्या काही दिवसात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून मोठी जिवीतहानी झाली. या पार्श्वभूमीवर  फडणवीस यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता राज्य सरकारने थोडा दूरगामी विचार करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

कोकण, प. महाराष्ट्र विशेषत: महाडनजीक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत  राज्य सरकारच्यावतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे. इतर धोकादायक गावे तात्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे.


 

First Published on: July 24, 2021 6:46 PM
Exit mobile version