राज्याचं पावसाळी अधिवेशन आता सप्टेंबरमध्ये होणार?

राज्याचं पावसाळी अधिवेशन आता सप्टेंबरमध्ये होणार?

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र आता ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर देखील कोरोनाचे सावट आहे. राज्यात वाढणारे कोरोनाचे रुग्ण पाहता पावासाळी अधिवेशन (Monsoon Session) सप्टेंबर महिन्यात घेण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक असून, या बैठकीमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

म्हणून अधिवेशन सप्टेंबरमध्ये होणार अधिवेशन!

यंदा पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरु होणार होते. मात्र मार्च महिन्यापासून राज्यात असणारे कोरोनाचे संकट यामुळे पावासाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन ते तीन दिवसांचा बोलावण्याचा विचार राज्य सरकारचा (Maharashtra Government) होता. मात्र अजूनही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत नसून, अधिवेशन काळात होणारी गर्दी लक्षात घेता ३ ऑगस्टला अधिवेशन घेणे योग्य नसल्याचे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. याचमुळे हे अधिवेशन देखील सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

आधीच मंत्री-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांना कोरोना लागण झाली होती. एवढेच नाही तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना देखील कोरोना लागण झाली होती. त्यामुळे अधिवेशनात होणारी मंत्री आणि अधिकाऱ्यांची गर्दी बघता राज्य सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. विशेष बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील काही निर्बंध घालूनच अधिवेशन घेण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे.

First Published on: July 28, 2020 12:41 PM
Exit mobile version