गाव तिथे ‘एसटी’ची इलेक्ट्रिक बस

गाव तिथे ‘एसटी’ची इलेक्ट्रिक बस

एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे पर्यावरण संवर्धनास मोठी चालना मिळणार आहे. ही इलेक्ट्रीक बस संपुर्णता इलेक्ट्रिक असल्यामुळे हवा प्रदुषण रोखता येईल. पुढील काळात इलेक्ट्रिक बसच्या वापरात वाढ करुन प्रदुषणाचा वाढता स्तर रोखता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीलाही चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे. तसेच मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. तसेच पुढील काळात हवेचे प्रदुषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल. असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असेही म्हटले आहे की, जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो, पण आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हे सुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. राज्यात मागील एका वर्षात आपत्तीग्रस्तांना १३ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात पर्यावरणातील बदलांमुळे येणाऱ्या अशा आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पुढील ५ वर्षात राज्यात इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

एसटीमध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या वापराला चालना मिळणार असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला ई-मोबिलीटीवर जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वीजेची गरज भासणार आहे. परंतु या विजेची गरज भगवताना ती हरित उर्जा कशी असेल यावर लक्ष द्यावे लागेल. सध्या एसटीमध्ये इंधनावरच सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. पण इलेक्ट्रिक बसच्या वापराला चालना देण्यात येईल. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरातून आपण शून्य प्रदुषणाकडे वाटचाल करणार आहोत. एकुण प्रदुषणातील वाहनांपासून होणारे प्रदुषण हे सर्वाधिक आहे. हे पाहता यापुढील काळात प्रदुषणाचा वाढता स्तर रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पर्याय नसेल. मागील काळात आपण मुंबईतील टॅक्सी, रिक्षा, बसेस सीएनजीवर परावर्तीत करु शकलो. यापुढील काळात शून्य उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, शहरांमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. एकुण प्रदुषणापैकी २५ टक्के वाटा हा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे. हे रोखण्यासाठी आपल्यालाही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल. पण हे करताना याबरोबरच आपल्याला हरित उर्जेकडे वळावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. देशात सुमारे ८० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. यापुढील काळात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या वापरास प्राधान्याने चालना देता येईल. तरुणांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांविषयी कुतुहल निर्माण होईल व ते याचा वापर करतील यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. सिंह यांनी मुंबईत मागील काही दिवसात खराब झालेल्या हवेच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त केली. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याशिवाय महानगरांमधील हवेचे प्रदुषण आपण रोखू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत दिवसभर झालेल्या चर्चेत टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, ओलेक्ट्राचे शरथ चंद्रा, टीव्हीएस मोटार्सचे कमल सूद, उबेरचे महादेवन नंबियार, युलुचे श्रेयांश शहा, ॲम्बिलिफी मोबिलीटीचे चंद्रेश सेठीया, व्हीजन मेकॅट्रॉनिक्सच्या राशी गुप्ता, ऑक्टीलियन पॉवर सिस्टीम्सचे यशोधन गोखले, युमिकोअरचे केदार रेले आदींनी सहभाग घेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना देण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर माहिती दिली.

 

First Published on: January 11, 2021 7:50 PM
Exit mobile version