कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठप्प होत आहे. शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहेत. चिपळूणमध्ये तर भयंकर परिस्थिती आहे. चिपळूणच्या जगबुडी आणि वशिष्ठी नदीने पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यात परशुराम घाटात दरड कोसळली. सध्या रस्त्यावर साचलेली माती आणि दगड बाजूला सारायचे कार्य प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.