राज्यात कॉँग्रेसची जी परिस्थिती झाली आहे त्यास आपणच जबाबदार आहोत असे वक्तव्य माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी केले आहे. तसेच जर लोकांना आपल्यासोबत यावे असे वाटत असेल तर लोकांसाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी वेळ पडल्यास गिरिश महाजनांच्या गाडीपुढे आडवे व्हा, भाजपचे कार्यालय फोडा. लाठ्या काठ्या खा, जेलमध्ये जा तरच लोकं तुमच्या मागे येतील असा सल्लाही यावेळी कुणाल राऊत यांनी तरुण कार्यकरत्यांना दिला. जळगाव (Jalgaon) येथे आयोजित युवक काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कुणाल यांनी प्रसंगानुरुप तरुण कार्यकत्यांना आक्रमक भूमिका घेण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी कुणाल यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवरही भाष्य केले. या गटबाजीमुळे काँग्रेसमध्ये माणसं राहीली नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. त्यासाठी आपणच जबाबदार असून लोक हवे असतील तर त्यांच्या कामासाठी आक्रमक पवित्रा घ्या. लोकांच्या कामाला प्राधान्य द्या. आपसात वाद न करता लोकांची काम करा असा सल्ला कुणाल यांनी तरुण कार्यकत्यांना दिला. लोकांच्या कामासाठी रेल्वे थांबवावी लागली तर थांबवा, मंत्री गिरिश महाजन यांच्या गाडीसमोर आडवे व्हा, लाठ्या अंगावर घ्या, तुमचे हात पाय तुटले , जेलमध्ये जावे लागले, भाजपचे कार्यालय फोडावे लागले तरी चालेल. कारण हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत. असा अजब सल्ला कुणाल यांनी यावेळी दिला. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसमधील गटबाजीवर वक्तव्य केली.