करोना विषाणूने राज्यभरासह देशभरामध्ये भीतीचे सावट निर्माण केले आहे. भारतामधील काही राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. महाराष्ट्रात आता ३३ करोना रूग्ण आढळले आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण या भागातून एक करोना रुग्ण आढळून आला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तसेच नागरिकांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी फोनवरून चर्चा केली. यावेळी राज्यातील करोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा आणि त्यासंबंधी उपाययोजना यावर चर्चा झाल्याचे सुत्रांकडून एएनआय वृत्तसंस्थेला सांगण्यात आले.
Sources: PM Narendra Modi had telephonic conversation with Maharashtra CM Uddhav Thackeray. They discussed the situation of #Coronavirus in the state and the measures regarding it. (file pics) pic.twitter.com/UjTVv38DBC
— ANI (@ANI) March 15, 2020
राज्यात काल चौदा संशयित करोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यानंतर आज कल्याणमधून एक करोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. याशिवाय औरंगाबाद येथील ५९ वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामु्ळे राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली आहे.
परदेशातील नागरिकांनी वैद्यकीय चाचणी होणार
करोनाचा प्रसार जलदगतीने होत असून देशवासियांनी यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.