Narendra Modi In Pune: पूर्वी भूमिपूजन व्हायचं, पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, मोदींचा नाव न घेता काँग्रेसला टोला

Narendra Modi In Pune: पूर्वी भूमिपूजन व्हायचं, पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, मोदींचा नाव न घेता काँग्रेसला टोला

पुणे: पूर्वी भूमिपूजन व्हायचं, पण लोकार्पण कधी होणार याची शाश्वती नसायची, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच्या काँग्रेस सरकारला टोला लगावलाय. पुण्याच्या विकासाशी संबंधित अनेक अन्य प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजनही झालंय. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला तुम्ही मला बोलावलं होतं. आता लोकार्पणाचीही तुम्ही मला संधी दिली. हे माझं सौभाग्य आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं मराठी म्हटल्यानंतर पुणेकरांनी टाळ्या वाजवून मोदींना दाद दिली. तसेच देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं असून, लोकमान्य टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख, भांडारकर आणि रानडेंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणत त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. आपल्या सर्वांच्या हृदयातील शिवाजी महाराजांचा हा पुतळा युवा पिढीमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करेल. पुणे मेट्रोच्या पायाभरणीसाठी तुम्ही मला आमंत्रित केले होते आणि आता उद्घाटन करण्याची संधी तुम्ही मला दिली हे माझे भाग्य आहे. योजना वेळेत पूर्ण होऊ शकतात, असा मेसेजही यात आहे. वेळेवर प्रकल्प पूर्ण केले जाऊ शकतात हे याचं उदाहरण आहे.पुण्याने शिक्षण, संशोधन आणि विकास, आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही आपली ओळख सातत्याने मजबूत केली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक सुविधा ही पुणेकरांची गरज आहे आणि आमचे सरकार पुणेकरांची ही गरज लक्षात घेऊन काम करत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलंय.

2014 पर्यंत देशातील फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता. उरलेल्या मोजक्या शहरांमध्येच मेट्रो पोहोचू लागली होती. आज मेट्रो देशातील 2 डझनहून अधिक शहरांमध्ये कार्यान्वित झाली आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे. सुविधा स्मार्ट करण्यासाठी प्रत्येक शहरात एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर असावे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी. प्रत्येक शहराला पाणी अधिक मिळण्यासाठी पुरेसे आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असावेत, जलस्रोतांच्या संवर्धनासाठी चांगली व्यवस्था करावी. प्रत्येक शहरात अधिकाधिक हरित वाहतूक, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी असाव्यात, असा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. प्रत्येक शहरात स्मार्ट मोबिलिटी, लोक वाहतूक सुविधांसाठी एकच कार्ड वापरतात, असंही त्यांनी सांगितलंय.

आजच्या झपाट्याने वाढणाऱ्या भारतात आपल्याला वेगावर आणि प्रमाणावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणूनच आमच्या सरकारने PM गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार केला आहे. कोणत्याही देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेग आणि प्रमाण. परंतु अनेक दशकांपासून आपल्याकडे अशा यंत्रणा होत्या की महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत असे. या सुस्त वृत्तीचा देशाच्या विकासावरही परिणाम होत आहे, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः मोदींच्या सरकारमुळेच पुणे मेट्रो झाली, फडणवीसांचा नेमका टोला कोणाला?

First Published on: March 6, 2022 1:38 PM
Exit mobile version