शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राची मुंबई क्राईम ब्रँचकडून होणार चौकशी

शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राची मुंबई क्राईम ब्रँचकडून होणार चौकशी

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरू झाली आहे. चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेचे चौघांचे पथक गुरुवारी (दि.13) नाशिकमध्ये दाखल होणार असल्याचे समजते. या पथकाकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी होऊ शकतेे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरे की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरमधील 1400 ते 1500 शपथपत्र तपासत असल्याचे पथकाने म्हटले आहे. या संदर्भात मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकरे यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडेचार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे.

याविषयी नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे की, संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन तयार करण्यात आलेले प्रमाणपत्र बोगस कसे असू शकतील. दरम्यान, असे काही आढळून आले असेल तर त्यांनी चौकशी करावी. पण पोलीस यंत्रणेला दमवण्याचा हा प्रकार आहे. यातून साध्य काहीच होणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीतून काय मुद्दे बाहेर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकशाहीत प्रतिज्ञापत्र देण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे. प्रतिज्ञापत्र तयार करताना शंभर रुपयांचा बॉण्ड, पैसे भरुन बॉण्ड घेतले जातात. त्याची कायदेशीर नोंदणीदेखील केली जाते. ही संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन हे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. एवढे करुनही निवडणूक आयोगाला या प्रतिज्ञापत्रांविषयी शंका वाटत असेल तर त्यांनी अधिसूचना काढायला हवी होती. पण आयोगाने असे केलेले नाही. मूळात प्रतिज्ञापत्र तपासण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू असताना पोलीस यंत्रणेला नाहक दमवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. : सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

First Published on: October 13, 2022 12:20 PM
Exit mobile version