‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय एल्गार

‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय एल्गार

इलेकट्रॉनिक वोटिंग मशिनविरोधात आंदोलन करताना सर्वपक्षिय पदाधिकारी व कार्यकर्ते.

भाजपने लोकसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीत ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा केल्याचा आरोप करीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सरकार व निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. मतदान प्रक्रियेमध्ये उपयोगात आणलेल्या ‘ईव्हीएम’ची चौकशी करावी आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी शुक्रवारी नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलनात करण्यात आली.

नाशिकमध्ये सर्वपक्षीयांच्यावतीने शालिमार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर आंदोलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये मोठी अनियमितता आणि घोटाळा झाल्यामुळे त्याचा फटका विविध राजकीय पक्षातील उमेदवारांना बसल्याचा आरोप करून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला. अनेक प्रगत देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान घेतले जात असताना व देशात २२ पक्ष ‘ईव्हीएम’ हटावची मागणी करत असताना ‘ईव्हीएम’वरच निवडणुका घेण्याचा अट्टाहास का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी ईव्हीएम हटाव, देश बचाओ, दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देण्यात आल्या. २१ ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित सर्वपक्षीय मोर्चात नाशिकमधूनही पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे यावेळी राजू देसले यांनी सांगितले.

आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे मनपा गटनेते शाहू खैरे, डॉ. डी. एल. कराड, डॉ. हेमलता पाटील, अनिल मटाले, माजी आमदार जयंत जाधव, योगेश कापसे, डॉ. संजय जाधव, शांताराम चव्हाण, समाधान भारतीय, स्वप्निल घिया, अनिल भडांगे, दत्तु बोडके, हंसराज वडघुले, राहूल ढिकले, नाना बच्छाव आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: August 9, 2019 9:18 PM
Exit mobile version