सगळे बंडखोर शांत होतील…

सगळे बंडखोर शांत होतील…

उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज आहेत हे खरं आहे. परंतु अनेकवेळा असे निर्णय पक्षाला घ्यावे लागतात. परंतू नाराजांशी चर्चा केली जाईल. माघारीच्या मुदतीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्वच बंडखोर माघार घेतील असे सूचक वक्तव्य करत आगे आगे देखो होता हेै क्या अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. नाशिक येथे आयोजीत युतीच्या मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्य शासनाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्रात पक्षांतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. भाजपचे खासदार ए.टी.नाना पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना देण्यात आली. मात्र अंतग्रत गटबाजी उफाळून आल्याने पुन्हा वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. धुळयात आमदार अनिल गोटे यांनी महाजन यांच्या विरोधात पुन्हा दंड थोपटले आहे. दिंडोरीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी कापल्याने थेट महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले. चव्हाण यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्जही नेला आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. जळगावमध्ये उमेदवारी बदलण्यात आल्याचे उदाहरण देत राजकारणात ऐनवेळी काहीही होऊ शकते, असे सांगत त्यांनी सस्पेन्स वाढवला आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज नेल्याने आपण भाजपमधेच असून मेैत्रीपुर्ण लढत करावी, अशी अन्यथा मी अपक्ष लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पक्षातूनच महाजन यांना कोंडीत पकडले जात असल्याचे दिसून येते.

या एकूणच पार्श्वभुमीवर महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, राजकारण म्हटलं की, राजी नाराजी सुरूच असते. अनेकांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असते. परंतु सगळयांची मागणी मान्य करणे शक्य होत नाही. परंतु आपण अनेक नाराजांशी चर्चा करत आहोत. अजून दहा दिवस बाकी आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सगळे बंडखोर शांत होतील असे सूचक वकतव्य त्यांनी केल्याने आता या बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपकडून काय रणनिती आखली जाते हे माघारीच्या दिवशी कळेलच.

First Published on: April 6, 2019 9:22 PM
Exit mobile version