वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करणार्‍यांवर प्राणघातक हल्ला

वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करणार्‍यांवर प्राणघातक हल्ला

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस. इन्सेटमध्ये जाळलेली दुचाकी.

चांदवड तालुक्यातील शिवाजीनगर (मतेवाडी ) येथे पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणार्‍यांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (३ मे) घडली. यावेळी जीव वाचवण्यासाठी श्रमदान करणारे ग्रामस्थ पळाल्यानंतर जमावाने त्यांच्या आठ ते नऊ दुचाकी जाळल्या.

शुक्रवारी सकाळी ७. ३० च्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील ७२ गावांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून त्यातील सुमारे २४ गावामध्ये महाश्रमदानाचे काम सुरू आहे. यातीलच शिवाजीनगरमध्ये डोंगरालगतच्या वनजमिनीत गावाला जेसीबी मशीन मिळाल्याने उत्साहात सकाळी ६ ला काम सुरू केले. श्रमदानात गावातील सुमारे १०० पुरुष, महिला, मुले सहभागी झाले. ग्रामस्थ कामात करत असताना आदिवासी समाजाच्या सुमारे २०० च्या समुहाने काम सुरू असताना साखळी करत श्रमदान करणार्‍यांवर गलुल, गोफणचा साह्याने दगडांचा अचानक हल्ला चढवला. यामुळे ग्रामस्थ भयभयीत होऊन सैरावैरा पळत सुटले. या हल्ल्यात बर्‍याच जणांना मार लागला. यात पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर जमावाने दुचाकींकडे मोर्चा वळवत त्यांच्यावर दगड घालत मोटारसायकलींची नुकसान करत सुमारे ८ ते ९ दुचाकी पेटवून दिल्या. जेसीबी चालकास बेदम मारहाण करत मशिनची देखील मोडतोड केली. साहित्य मोडतोड करून फेकून देण्यात आले.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक मालेगाव नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड आर. रागसुधा, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक चांदवड संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वडनेरभैरव सचिन साळुंके, दंगल नियंत्रक पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, चांदवड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

First Published on: May 3, 2019 9:46 PM
Exit mobile version