दिव्यांग बालनाट्य स्पर्धेस दणक्यात सुरुवात

दिव्यांग बालनाट्य स्पर्धेस दणक्यात सुरुवात

सामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांचे जीवन कठीण असले तरी त्यांचे जगणे इतरांनाही स्फूर्ती देणार आहे. ही मुले त्यांच्या कलाकृतीतून दाखवून देत आहेत, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे व्दितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) कालिदास नाट्यगृह येथे दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. झनकर म्हणाल्या, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतून मुलांना कलाविश्वात मुक्त संचाराची संधी आहे. जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या स्पर्धांमध्ये सहभागी केले जाईल, यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी प्रा.रवींद्र कदम, श्यामराव लोंढे, राजेश जाधव, दिना वाघ, हेमंत गव्हाणे आदी उपस्थित होते.
बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाच नाटकांचे सादरीकरण झाले. त्यात राष्ट्रमाता शिक्षण मंडळ,नागपूरने धोंडफळ नाट्य सादर केले. सुरुवातील प्रबोधिनी विद्यामंदिर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मनीषा नलगे लिखित कांचन इप्पर दिग्दर्शित काव काव नाट्य सादर केले. हक्कांसाठी लढण्यापेक्षा स्वकर्तव्याशी एकनिष्ठ राहून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून केलेले कर्तव्य निष्फळ ठरत नही, याची शिकवण धोंडफळ नाट्यातून दिली. या नाट्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. पडसाद अपंग व पुनर्वसन केंद्र,नाशिक यांच्या पल्लवी पटवर्धन लिखित व दिग्दर्शित होम अरेस्ट, मुंबईच्या रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ.विजया वाड लिखित व भरत मोरे दिग्दर्शित मंकू माकडे व नाशिकच्या पुनर्वास मतिमंद मुलांच्या शाळेने शुभांगी पोवार लिखित व दिग्दर्शित हरवत चाललंय बालपण हे नाटक सादर केले. नाट्य स्पर्धेचे परीक्षण नयना डोळस, वृषाली घारपुरे, निलांबरी खामकर करत आहेत.

First Published on: February 14, 2020 2:33 PM
Exit mobile version