बाळासाहेब असते तर त्यांनी थोबाडीत लगावली असती

बाळासाहेब असते तर त्यांनी थोबाडीत लगावली असती

अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेब असते तर त्यांनी थोबाडीत लगावली असती’ अशा शब्दात खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. मुस्लिमांच्या मतांसाठी हे सगळं करताय का असा सवालही त्यांनी केला. त्रिपुरात मुस्लिमांवरील कथित हल्ले आणि मोहम्मद पैगंबरांबद्दल कथितपणे वापरण्यात आलेले अपशब्द याचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये हिंसक वळण लागले. या तिन्ही ठिकाणी जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. तसेच वाहनांची जाळपोळही केली. त्याच्या निषेधार्थ भाजपने शहर बंदचे आवाहन केले. या बंदलाही हिंसक वळण लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप अशा प्रकारच्या दंगली घडवून आणत आहे अशी टीका खा. संजय राऊत यांनी केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना म्हटले की, आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जीवंत हवे होते. त्यांनी एक थोबाडीत मारली असती. काय चालले आहे? राज्य करा. मुस्लिमांचे मते मिळवा. पण मुस्मिलांमधील पाच टक्के जे गडबड करतात त्यांना वठणीवर न आणताना अमरावती, मालेगावात अस्वस्थता निर्माण करण्यार्‍यांवर पूर्वीसारखी टीका करा. मस्मिल मतांची काळजी करु नका, असा टोलाही त्यांनी लगावला. रझा अकादमी भाजपचे पिल्लू आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? इतक्या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्या तरी भाजपचाच हात? तीन पक्ष एकत्र असूनही तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहे. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. आजी गृहमंत्री आता आजारातून उठले आहेत. तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवलं जात आहे. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत करायला हरकत नाही. मात्र शांततेत करा. ते घडत नसेल तर त्याचा निषेध करायला नको का? असा सवालही त्यांनी केला.

चंद्रकांत पाटील उवाच-

First Published on: November 13, 2021 1:55 PM
Exit mobile version