एक लाख वृक्षलागवडीतून ब्रह्मगिरीवर अवतरणार हिरवाई

एक लाख वृक्षलागवडीतून ब्रह्मगिरीवर अवतरणार हिरवाई

एक लाख वृक्षारोपणासाठी सुमारे पाच ते सहा कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याकरीता सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने पर्यायाने स्थानिकांना रोजगार निर्माण होणार आहे.या वृक्षांना पाणी देण्यासाठी ब्रम्हगिरीवर ८ ते १० तलाव तयार करण्यात येणार आहे. याव्दारे १ लाख २० हजार कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.याकरीता मेटघर ग्रामसभेत ठरावही मांडण्यात आला आहे. हा ठराव मंजूर होताच सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तलाव बांधण्यात येणार आहेत.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासुन भूमाफिया दिवसाढवळ्या ब्रह्मगिरीवर उत्खनन करत असताना शासकीय यंत्रणा केवळ कागद रंगवण्यात व्यस्त आहे. मात्र, ब्रह्मगिरी सह्याद्री देवराई संस्था आणि मेटघर ग्रामसभेने आता ब्रह्मगिरी संरक्षणासोबतच हरित ब्रह्मगिरी साकारण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर या माध्यमातून पर्यटन, रोजगारवाढीलाही चालना दिली जाणार आहे. याची सुरूवात १ लाख वृक्ष लागवड मोहिमेपासून होईल.

ब्रह्मगिरीला पौराणिक, आध्यात्मिकदृष्टया अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण मानले जाते. ब्रह्मगिरीच्या आसपास अंजनेरी, बसगड, उतवड यांसारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारा शिवस्वरूप ब्रह्मगिरी गेल्या काही वर्षांपासून त्यावरील वृक्षवेली नाहीसे होऊन अक्षरशः बोडका होत आहे. पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते. परंतु, अलीकडे भूमाफीयांकडून ब्रह्मगिरीचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मगिरीचे उत्खनन रोखण्यासाठी व भूमाफीयांविरूध्द लढा देण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा कायदेशीर लढा सुरू आहे. परंत, आता ब्रह्मगिरीच्या संरक्षणासोबतच तो पुन्हा हरित करण्यासाठी ब्रह्मगिरी सह्याद्री देवराई संस्थेच्या पुढाकारातून १ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून हरित ब्रह्मगिरी साकारण्याबरोबरच येथील आसपाच्या पाड्यांवरील लोकांना रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला असून या संकल्पनेला मेटघर ग्रामसभेने मान्यताही दिली आहे.
काय आहे संकल्पना

ब्रह्मगिरीवर केवळ वृक्षारोपण करून होणार नाही. तर या ठिकाणी दोनशे प्रकारची विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याकरीता भारतातील विविध नर्सरीमधून रोपे आणण्यात येणार आहे. यात दुर्मिळ वनस्पतींबरोबर, काही औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांच्या माध्यमातून फुड इंडस्ट्री उभी करण्याचा मानस आहे जसे, जांभळाच्या झाडांची लागवड करून त्यापासून फेणी बनवली जाते. तसेच. बांबुची लागवड करणे यांसारख्या वृक्षलागवडीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच वृक्षराजीमुळे येथे पक्ष्यांचा अधिवास वाढून अन्नसाखळी निर्माण होण्यास मदत होणार आहे. हरित ब्रह्मगिरीमुळे येथील पर्यटनालाही चालना मिळून याव्दारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ब्रह्मगिरी वाचवण्यासाठी लोकचळवळ उभारण्यात आली आहे. परंतु. ब्रह्मगिरीला पुर्नवैभव प्राप्त करून देतानाच हरित ब्रह्मगिरीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. याकरीता मेटघर ग्रामसभेनेही पुढाकार घेतला आहे. : मनीष बावीस्कर, पर्यावरणप्रेमी,ब्रम्हगिरी सहयाद्री देवराई संस्था

First Published on: August 31, 2022 1:18 PM
Exit mobile version