वीजचोरांवर महावितरणचा बडगा; एकाच दिवसांत ४८८ जणांवर कारवाई

वीजचोरांवर महावितरणचा बडगा; एकाच दिवसांत ४८८ जणांवर कारवाई

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा कवच

नाशिक: वीजचोरी आणि अनधिकृत वापराविरोधात महावितरणने मोहीम हाती घेतली असून एकाच दिवसांत २८५० विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये ४८८ जणांवर कारवाई करण्यात आली.

वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणार्‍या ग्राहकांमध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ८, नाशिक शहर २ मध्ये ७४, नाशिक ग्रामीणमध्ये २१३, चांदवडमध्ये १२८ जणांवर कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसर्‍या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ४, नाशिक शहर २ मध्ये ३०, नाशिक ग्रामीणमध्ये १३, चांदवडमध्ये १८ जणांवर कारवाई करण्यात आली, अशाप्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार ४८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये वीज देयक न भरणार्‍या ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, अशा ठिकाणी बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्याने त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय दीक्षित (नाशिक शहर १), माणिकलाल तपासे (नाशिक शहर २), राजाराम डोंगरे (नाशिक ग्रामीण) व रवींद्र आव्हाड (चांदवड) यांच्यासह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

First Published on: December 10, 2021 10:10 AM
Exit mobile version