निर्यातबंदीनंतर कांदा दरात हजाराची घसरण

निर्यातबंदीनंतर कांदा दरात हजाराची घसरण

केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याच्या किंमतीतील घसरण सुरू आहे. निर्णयानंतर आतापर्यंत किंमती हजार रुपयांनी घसरल्या. मागील आठवड्यात शनिवारी (दि.२८) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला क्विंटलला सरासरी ३६०० रुपये दर मिळाला होता. शुक्रवारी जिल्ह्यात कांद्याला क्विंंटलला सरासरी २६०० रुपये दर मिळाल्याने नियातबंदीच्या निर्णयानंतर दरात जवळपास ३० टक्के घसरण झाली आहे.

केंद्र सरकारने रविवारी (दि.२९ सप्टेंबर) कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी (दि.३०) जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांनी आंदोलन करून लिलाव बंद पाडले. मात्र, काही वेळानंतर लिलाव पूर्ववत झाले होते. मात्र, निर्यातबंदीमुळे देशातील कांदा उपलब्धतेचे प्रमाण वाढले असून कांद्याच्या किमती कोसळत आहेत. सोमवारी कांद्याच्या सरासरी दरात क्विंटलला रुपयांची घसरण होऊन सरासरी तीन हजार रुपये दर मिळाले. त्यानंतर कांद्याची आवक कमी होऊनही जिल्ह्वातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर तीन हजार रुपयांच्या खालीच आहेत. शुक्रवारी (दि.४)यात आणखी घसरण होऊन सरासरी २६०० रुपये दर मिळाले. निर्यातबंदीच्या निर्णयापासून विचार केला, तर आतापर्यंत कांद्याचे दर जवळपास तीस टक्क्यांनी घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

असे घसरले दर…

२८ सप्टेंबर – ३६००
३० सप्टेंबर – ३०००
२ ऑक्टोबर – ३१५०
३ ऑक्टोबर – २७००
४ ऑक्टोबर – २६००

First Published on: October 5, 2019 11:59 PM
Exit mobile version