पावसाची विश्रांती; पूरपरिस्थिती कायम

पावसाची विश्रांती; पूरपरिस्थिती कायम

होळकर पूलावरून पुराचे दृश्य

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (दि.५) दुपारपासून विश्रांती घेतल्याने धरणातून करण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आल्याने गोदावरीची पूर पातळी कमी झाली असली तरी गोदावरीला पूरपरिस्थिती कायम आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ४५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दरम्यान पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने गंगापूर, दारणासह जिल्ह्यातील १३ धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने गंगापूर धरणातून ५० हजार क्युसेकपर्यंत करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली. होळकर पुलाखालून आतापर्यंचा सर्वाधिक ८३ हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आल्याने नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले. सरकारवाड्यापर्यंत पाणी पोहोचले. गोदाकाठावरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने संपर्कही तुटला. पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांचे तातडीने स्थलांतरही करण्यात आले. सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळी ११ वाजेवासून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून रविवारी होणारा ५० हजार क्युसेकचा विसर्ग सोमवारी १२ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला तर होळकर पुलाखालून दुपारनंतर २५ हजार क्युसेक करण्यात येत होता. त्यात पावसानेही विश्रांती घेतल्याने पूर पातळी काहीअंशी कमी झाली. गाडगे महाराज पुलावरून वाहणारे पाणीही ओसरत थेट पुलाच्या खाली उतरले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी गोदावरीला पूरपरिस्थिती कायम आहे. सराफ बाजार, भांडी बाजार, दहीपूल परिसरातील पाणी ओसरू लागल्याने व्यावसायिकांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केल्याचे दिसून आले.

आजपासून पंचनामे

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन दुकानातील मालाचे नुकसान झाले, तर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ग्रामीण भागात शेतात पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली. एकूणच या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. पंचनामे करताना जिओ टगिंग करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

नांदुरमध्यमेश्वर विसर्ग (क्युसेकमध्ये)

सकाळी ७ वाजता २६९२९८
सकाळी ८ वाजता २३४३४८
सकाळी ९ वाजता १९६१३२
सकाळी १० वाजता १९३१४३
सकाळी ११ वाजता १८४३६९
दुपारी १२ वाजता १७०४०५
दुपारी १ वाजता १६२४३९
दुपारी २ वाजता १५७४०९
सायंकाळी ५ .०० वाजता १३६१३३

पूर परिस्थिती

धरणातील विसर्ग क्युसेकमध्ये

First Published on: August 5, 2019 11:59 PM
Exit mobile version