पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन पेटवल्या बोटी

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन पेटवल्या बोटी

रामकुंड परिसरामधील गांधी तलावातील चार बोटींच्या जाळपोळप्रकरणातील तिघांच्या पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनंतर मुसक्या आवळ्या आहेत. यातील चौथा साथीदार फरार आहे. विशेष म्हणजे, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या कारणातून आणि हातगाडी लावण्याच्या वादातून चारजणांच्या टोळक्याने चार बोटी पेट्रोल टाकून जाळ्याचे समोर आले आहे.

विकास मंगेश व्यवहारे ऊर्फ पिठल्या (व २७, रा. बालाजी नगर, गंगाघाट, पंचवटी), अजय बाळू जाधव ऊर्फ भैयट्या (२४, रा. दरी-मातोरी) व अक्षय हिरामण जाधव ऊर्फ एजे (२४, रा. गंगाघाट) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

२४ मार्च २०२१ रोजी मध्यरात्री दीड वाजता गांधी तलावातील बोटिंग क्लबमधील ४ बोटी आग लावून पेटवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना तपासादरम्यान दोन टोळ्यांच्या संघर्षातून बोटींची जाळपोळ करण्यात आल्या संशय पोलिसांना होता. कोणताही ठावठिकाणा नसताना पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व त्यांच्या पथकाने तीन महिन्यांपासून कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करुन तपास लावला. पथकातील शिपाई राकेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरुन हा गुन्हा उघडकीस आला.

संशयित अक्षय जाधव व त्याचा साथीदार आकाश प्रभाकर मोहिते यांनी संगनमताने बोटी जाळल्याची कबुली दिली. संशयित विकास व्यवहारे याचा तक्रारदारासोबत गंगाघाट येथे लिंबू सरबतची हातगाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. तर अजय जाधव हा पोलिसांचा खबरी असून गंगाघाटावरील सर्व माहिती पोलिसांना देतो म्हणून त्याला तक्रारदाराने बोटी जाळण्यापूर्वी दमदाटी करुन धमकी दिली होती. त्या रागातून संशयितांनी संगनमताने ४ बोटींवर पेट्रोल ओतून आग लावून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

First Published on: July 3, 2021 6:57 PM
Exit mobile version