..तर डॉक्टरांवर कारवाई : शरद पवार

..तर डॉक्टरांवर कारवाई : शरद पवार

शरद पवार यांचा गंभीर आरोप

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारमार्फत रूग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र रूग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर पुढे येत नसल्याच्या तक्रारी येतात. नाशिकमध्ये तर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून डॉक्टर्स तयार होतात. असे असतांनाही डॉक्टर्स पुढे येत नाहीत हे दुर्दैव आहे. मात्र आता अशा प्रकारे सेवा नाकारणार्‍या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याची वेळ आणू नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलतांना पवार म्हणाले, देशात महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या जिल्हयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढते आहे. याकरिता तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री स्वतः यात पूर्णपणे लक्ष घालून चोवीस तास काम करत आहेत. आम्ही देखील राज्याचा दौरा करून अडचणी जाणून घेउन याबाबत निरीक्षण नोंदवत आहोत. परंतु रूग्णसंख्या वाढत असल्याने बेडसची संख्याही वाढवणे आवश्यक आहे याकरीता नाशिक महापालिकेला आजच्या बैठकीत सुचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनबाबत विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय हा त्या त्या जिल्हयातील परिस्थिती पाहून स्थानिक स्तरावर घ्यायचा आहे. परंतु तज्ञांच्या मते यापुढे कोरोनासोबतच जगावे लागेल मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता शासनामार्फत सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी संपुर्ण राज्यभरातूनच येत आहेत. उपचारासाठी डॉक्टरांनी नकार देणे हे चांगले लक्षण नाही पण आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकार्‍यांना कारवाइ करावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नाशिकला येण्याची इच्छा आहे कदाचित तेही लवकरच नाशिकला भेट देतील असेही ते म्हणाले.

अल्पसंख्याक समाजाने सामंजस्याची भुमिका घ्यावी

१ ऑगस्ट रोजी होणार्‍या बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्याची परवानगी मिळावी अशी मागणी एमआयएमने केली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, लॉकडाउनच्या काळात अल्पसंख्याक समाजाने सामंजस्याची भुमिका दाखवत ईद साध्यापध्दतीने साजरी केली. यंदाही राज्यातील अल्पसंख्याक समाज सामंजस्याची भुमिका घेईल असे ते म्हणाले.

काय म्हणाले पवार…
* देवेंद्र फडणवीस व भाजपने कोरोना काळात राजकारण करू नये.
* केंद्राच्या पॅकेजबाबत अद्याप माझ्या ज्ञानात भर पडलेली नाही.
* लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा.
* राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला कोरोनामुळे मोठा फटका बसला.
* राज्यातील अर्थचक्राला गती मिळणे आवश्यक.
* डॉक्टरांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ आणू नये.

भाजपने राजकारण करू नये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील राज्यात दौरे करून सरकारच्या कामगिरीवर आरोप करत असल्याबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही देणे लागतो. ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी एकत्रित येऊन या परिस्थितीचा मुकाबला करणे आवश्यक आहे. फडणवीसांनीदेखील या कामात लक्ष घालावे आणि राजकारण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिला.

First Published on: July 24, 2020 6:32 PM
Exit mobile version