वऱ्हाडाची पिकअप नदीपात्रात कोसळली, दोघांचा मृत्यू

वऱ्हाडाची पिकअप नदीपात्रात कोसळली, दोघांचा मृत्यू

लासलगाव – लग्नसोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाची पिकअप नांदुरमध्यमेश्वर नदीपात्रात कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. या घटनेत गाडीतील ८ प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

सायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव नेऊर (ता. येवला) येथील वऱ्हाडी सिन्नर येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी मंगळवारी सकाळी गेलेले होते. विवाहानंतर परतत असताना हा अपघात झाला. निफाड-सिन्नर मार्गाने जात असताना गोदावरी नदीवर दुपारी सव्वादोन वाजेदरम्यान समोरून आलेल्या वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि पीकअप ((एम एच-08, एच-5798) थेट नदीपात्रात कोसळली. या अपघाताच्या मोठ्या आवाजाने याच नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे याने रमजू शेख व सोमनाथ कुऱ्हाडे यांच्या मदतीने पाण्यात उडी घेत मदतकार्य सुरू केले. गाडीतील १५ व्यक्तींना या तिघांनी बाहेर काढले. घटनेची माहिती समजताच नांदूरमध्यमेश्वर येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ, खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड, विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य करत जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

या घटनेत सई विकास देवकर (वय ५) आणि मधुकर घुले (५५) या दोघांचा मृत्यू झाला. सायखेडा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ करत आहेत.

First Published on: July 13, 2021 6:57 PM
Exit mobile version