गंगापूर धरणातून ९००० क्युसेक विसर्ग

गंगापूर धरणातून ९००० क्युसेक विसर्ग

संततधार पाऊस आणि गंगापूर धरणातून होणारा विसर्ग यामुळे गोदावरीची पूर पातळी अद्याप कायम आहे.

नाशिक पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाच हजार क्युसेकचा विसर्ग सायंकाळी नऊ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या रविवारी गोदावरीमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली होती. सोमवार आणि मंगळवार पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे गोदावरीचा पूर बर्‍यापैकी ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. हवामान खात्याकडून पुढील जिल्ह्यातील घाट प्रदेशात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने गोदाकाठाला पुन्हा सतर्कतच्या सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस होऊ लागल्याने गोदापात्रात सुरू असलेल्या विसर्गात ५हजार १०२ क्युसेकचा विसर्ग सायंकाळी वाढवण्यात येऊन ६ हजार १६० क्युसेक करण्यात आला. तर होळकर पुलाखालून ७ हजार ८३० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता, तो ९ हजार ४६९ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेले आहे. नांदुरमध्यमेश्वरमधूनही ३९ हजार ४१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे मराठवाड्याला या बंधार्‍यातून पाणी मार्गस्थ करण्यात येत आहे.

शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ ते साडेपाच या वेळेत ६.९ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी (दि.९) सकाळपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३२ मिमी, दारणा १३ मिमी, भावली ४० मिमी, काश्यपी १७ मिमी., गौतमी १८ मिमी, त्र्यंबक ५५ मिमी., अंबोली ६३ मिमी इतका नोंदवला गेला.

First Published on: August 10, 2019 8:37 AM
Exit mobile version