पोलीस हवालदार महिलेचा रविवारी (दि.२९) संशयास्पद मृत्यू झाल्याचे उडकीस आले आहे. मनीषा गोसावी (३५, रा. अयोध्या अपार्टमेंट, जेलरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. आडगाव पोलीस ठाण्यात ही महिला नोकरी करत होती. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने आत्महत्या केली की नैसर्गिक मृत्यू झाला? याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. महिलेला मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नोकरीस असलेल्या गोसावी या २० डिसेंबरपासून रजेवर होत्या. त्या रविवारी नांदुरनाका पोलीस चौकीजवळील रस्त्यालगत दुचाकी उभी करून थांबल्या आणि बेशुध्दावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. नागरिकांनी पोलीस असल्याचे ओळखून त्यांना तत्काळ खासगी रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करत पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. गोसावी यांनी आठवडाभरापुर्वी शहर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील याच्यांविरूध्द तक्रार दिली होती. या प्रकरणाची सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली होती.
त्यांच्या जिल्हा रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट न सापडल्याने गोसावी यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील याच्या वाद झाला होता. त्यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.