विनाहेल्मेटमुळे अनेकदा सकंटांना सामोरे जावे लागते. एकवेळ दंड परवडला पण विनाहेल्मेटमुळे पोलिसांनी ताब्यात घेणे, समुपदेशन करणे हे जबाबदार नाशिककर म्हणून मनाला पटले नाही. हेल्मेट नियमित वापरणे कुटुंबियांसाठी किती महत्वाचे आहे, हे आता समजले असून, आयुष्यभर दुचाकीवरुन प्रवास करताना आता हेल्मेट वापरणार आहोत, अशी भावना समुपदेशनानंतर तरुणाईने दैनिक ‘आपलं महनगर’शी बोलताना व्यक्त केली.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरातील अपघात रोखण्यासह वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनोखी हेल्मेट सक्ती सुरु केली आहे. त्यानुसार हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकास थेट पोलीस वाहनात बसवत ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे आणत त्याचे समुपदेशन केले जात आहे. याठिकाणी त्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्यात आले. समुपदेशाच्या सुरुवातीस आणि शेवटी तरुणाईच्या भावना वेगवेगळ्या होत्या. पोलिसांनी दंड घेतला असता बरे झाले असते. आता दोन तास काय करायचे, मित्र-मैत्रिणींना काय सांगायचे, पोलिसांनी ताब्यात घेतले तर आवडती व्यक्ती आपल्याशी बोलेल का, असे असंख्य प्रश्न तरुणाईच्या मनात होते. मात्र, समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर तरुणाईच्या मतांमध्ये परिवर्तन झाले. बरे झाले पोलिसांमुळे हेल्मेटचे महत्व आणि वाहतूक नियम समजले. पोलीस कारवाई झाली ती चांगलीच झाली. आता आयुष्यभर इतरांनाही हेल्मेटचे महत्व पटवून सांगेन, असे अनेक तरुणांनी समुपदेशनानंतर
बोलताना सांगितले.