देवेंद्र फडणवीसांचा जवळचा व्यक्ती वानखेडेंना भेटतो; नवाब मलिकांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

देवेंद्र फडणवीसांचा जवळचा व्यक्ती वानखेडेंना भेटतो; नवाब मलिकांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा जवळचा व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत आहे. हा व्यक्ती निरज गुंडे आहे. हा मागील फडणवीस सरकारचा दलाल आहे, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खळबळजनक दावे केले. निरज गुंडे या व्यक्तीने नवाब मलिक यांच्या मुलाच्या जमीन खरेदी संदर्भात ट्विट केलं होतं. यावर नवाब मलिक यांनी बोलताना खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “निरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री येऊन बसत होते. त्या दलालाला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश होता. तो दलाल वर्षावर कायम फिरत असायचा, सगळ्या विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात जायचा. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. अशी कोणती भीती या नेत्यांना वाटत आहे. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही सर्व प्रकरणं विधानसभेच्या पटलावर आणणार. असा खुलासा करणार की भाजप महाराष्ट्रात तोंड दाखवायला राहणार नाही,” असं नवाब मलिक म्हणाले.

या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा ना दूताच्या माध्यमातून कशाला भेटता अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

पुढे बोलताना नवाब मलिक यांनी सांगितलं की, समीर वानखेडेचं कुटुंब आठवले आणि सोमय्या यांना भेटत आहेत, त्या अगोदर समीर वानखेडेने आठवले यांची भेट घेतली आहे, तर काही मागासवर्गीय नेत्यांचीही भेट घेतली आहे, असा दावा केला.

माध्यमातून वानखेडेंनी धर्म बदलला नाही कसं सांगता

काल मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे यांनी धर्म बदलला नाही असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं. हलदर तुम्ही संविधानिक पदावर आहात त्याचा मान राखा असं सांगतानाच आयोगाची एक कार्यप्रणाली आहे. एखाद्याने तक्रार केली तर त्याची चौकशी केली पाहिजे व त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली.

दरम्यान समीर वानखेडे याने धर्म बदलला नाही हे तुम्ही बोलत आहात हे सत्य आहे कारण तो जन्मापासूनच मुसलमान आहे. त्याच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुलं लहानपणापासून मुसलमान आहेत. मुसलमान पध्दतीने जगले आहेत. मी समीर वानखेडे याच्या लग्नाचा विषय समोर आणला. मी काल (शनिवारी) एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. तो समीर वानखेडे याच्या बहिणीचा नवरा आहे. आज तो युरोपच्या वॅनिसमध्ये राहतो. मुळचा तो सुरतचा राहणारा आहे. हा विषय आम्ही समोर आणला आहे. जिचा नवरा आहे तिने ट्वीट करुन हा फोटो का आणला अशी विचारणा केली. मी हा फोटो समोर आणला नाही. जर तुमच्याकडे आयोग चौकशी करेल त्यावेळी आम्हाला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व जात पडताळणी समितीकडेही तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मी धर्म आणि जातीची लढाई लढत नाहीय त्याने फर्जीवाडा केला. दलित तरुणांचा अधिकार हिरावून घेतला त्याविरोधात लढाई आहे असे सांगतानाच हलदर तुम्ही कधी पदावर आलात हे माहीत नाही परंतु ज्या पदावर बसला आहात त्या पदाची गरीमा बदनाम करु नका अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.

 

First Published on: October 31, 2021 3:43 PM
Exit mobile version