गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे ही घटना घडली आहे. कोसफुंडी फाट्याजवळ तीन जणांचे मृतदेह सापडले आहे. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे कसनासूरमध्ये खळबळ उडाली आहे.
कसनासूर चकमकीत ४० नक्षलवाद्यांचा खात्मा
भामरागड तालुक्यातील कसनासूर गावातील तिघांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी अशी हत्या करण्यात आलेल्या तीन जणांची नावं आहेत. हे तिघेही कसनासूर गावचे रहिवासी होते. २२ एप्रिल २०१८ रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. याचाच बदला म्हणून या तिघांची हत्या करण्यात आली आहे. हे तिघेही पोलिसांचे खबरी होते.
पोलिसांचा खबरी असल्याने हत्या
कसनासूर चकमकीतील खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी या तिघांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची हत्या करुन मृतदेह कोसफुंडी फाट्याजवळ टाकण्यात आले. आज सकाळी या तिघांचे मृतदेह सापडले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी यासंदर्भात एक बॅनर घटनास्थळी लावला असून त्यामध्ये कसनासूर चकमकीतील खबरी असल्याने तिघांची हत्या केली असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आणखी दोन जणांचे अपहरण केले आहे.