दिल्लीतील तबलीगी मकजच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबातच गरज नव्हती. महाराष्ट्रातही अशाप्रकारची परवानगी मागण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परवानगी नाकारली. मात्र आज वृत्तवाहिन्यांवर वारंवार तबलीगी मरकजची बातमी दाखवून एका समाजाच्या विरोधात भावना भडकिवण्यात येत आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील बैल गाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्याला हजारो लोक जमले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करुन या स्पर्धेचे आयोजन हाणून पाडले. अशाप्रकारची तत्परता दिल्ली पोलिसांनी दाखवायला हवी होती. आज लॉकडाऊनचा तेरावा दिवस आहे. उरलेल्या दिवसांत आपण योग्य ती काळजी घेतली तर आपण कोरोनावर मात करु शकतो.
यानंतर संपुर्ण देशाच्या अर्थकारणावर आणि लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट टळल्यानंतर या दोन आव्हानावर आपल्याला काम करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले आहेत की, यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. पुढच्या सहा महिन्यात तज्ज्ञांनी बोलून, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एखादा टास्क फोर्स नेमण्याची विनंती केली आहे.