आघाडीचे जागा वाटप निश्चित काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५, मित्रपक्ष ३८

आघाडीचे जागा वाटप निश्चित काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५, मित्रपक्ष ३८

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार विधान सभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार आहे. उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. “दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढले असते तर विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. मात्र मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडी करण्यावर जोर दिला आहे.”, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवणार असले तरी त्यात ५ ते ६ अशा जागा आहेत की त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या जागा राष्ट्रवादीकडे असून काँग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर काँग्रेसकडे असलेल्या ५ ते ६ जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदल करण्यात येईल. उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत, असे माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्ष हुकूमशाहीच्या मार्गाने देशाची वाटचाल करत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात मंदीची लाट आहे. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण चुकले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिका वाहन विक्रीचे शोरुम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

First Published on: September 15, 2019 10:28 PM
Exit mobile version