‘आधी केलेलं पाप धुवून काढा, मग आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीची भाजपवर बोचरी टीका

‘आधी केलेलं पाप धुवून काढा, मग आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीची भाजपवर बोचरी टीका

'आधी केलेलं पाप धुवून काढा, मग आशीर्वाद मागा', राष्ट्रवादीची भाजपवर बोचरी टीका

भाजपची राज्यात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरु आहे. या यात्रेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपवर बोचरी आणि जहरी टीका केली आहे. आधी केलेलं पाप धुवून काढा मग आशीर्वाद मागा, असं फलकच राष्ट्रवादीने लावलं आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यावरुन टीका करण्यात आली आहे. हे फलक ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत.

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडू लागले आहेत. एकीकडे महागाईने उच्चांक गाजलेला असतानाच भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेद्वारे मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती सांगितली जाणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीकास्त्र डागलं आहे. इंधनाचे दर गगनाला भिडत असताना जनतेचा आशीर्वाद कोणत्या तोंडाने मागितला जात आहे? असा सवाल करीत हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे या होर्डिंग लावण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. १६ ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्यात भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षाप्रमाणे अनेक खोट्या घोषणा केल्या. महागाई कमी करु, शंभर लाख कोटींची गुंतवणूक करुन रोजगार निर्मिती करु, अशी आश्वासने दिली. पण, वस्तूस्थिती अशी आहे की, दोन दिवसांपूर्वी जो गॅस सिलिंडर ८३४ रुपये होता, तो आता २५ रुपयांनी वाढून ८५९ रुपये ९० पैसे झाला आहे. पेट्रोल १०८ तर डिझेल ९८ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांचा खोटा आशीर्वाद घेण्याचे काम भाजप करीत आहे, अशी घणाघाती टीका परांजपे यांनी केली.

First Published on: August 19, 2021 6:03 PM
Exit mobile version