आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून अमोल कोल्हे यांचा चेहरा सध्या सगळीकडे झळकतो आहे. अमोल कोल्हे देखील शिवस्वराज्य यात्रेतून त्यांच्या शैलीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर परखड टीका करत आहेत. बीडमधल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेमध्ये सत्ताधारी सेना-भाजपवर निशाणा साधला. ‘भाजप सरकारची सत्ता उलथून टाकण्याचा ‘पण’ राज्यातील तरुणांनी केला आहे. आता तरुणांमधल्या असंतोष, अस्वस्थतेचा स्फोट होणार आहे’, अशी तोफ यावेळी अमोल कोल्हेंनी डागली.
‘ज्यांची डिग्री बोगस, त्यांनी आम्हाला काय शिकवावं?’
दरम्यान, यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी रोजगाराच्या दाव्याचा समाचार घेतला. ‘राज्यात ९८३ कारखाने बंद पडले आहेत हे स्वत: सरकार सांगत आहे. मग कुठून होणार रोजगार निर्मिती? शिवस्वराज्य यात्रेत आम्हाला भगिनींकडून राखी बांधली जाते आणि दुसरीकडे महाजनादेश यात्रेत आंदोलन करतील म्हणून घाबरुन एका भगिनीला नजरकैदेत ठेवलं जातं ही परिस्थिती आज दिसत आहे. म्हणून तुमच्या मनगटातली ताकद आता दाखवून द्या’, असं देखील खासदार अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं. तसेच, विनोद तावडेंवर टीका करताना ‘तुमची डिग्रीच बोगस आहे, त्यांनी आम्हाला काय शिकवावं?’ असा खोचक टोमणा देखील अमोल कोल्हेंनी मारला.
हेही वाचा – आमदाराचे लिंबू आणि मुख्यमंत्र्यांचे गाजर; आता बांधलेच पाहिजेत – मुंडे
‘विनोद तावडे भीक मागत होते’
‘सरदार वल्लभभाई यांचा पुतळा गुजरातमध्ये उभा राहतो. पुतळे उभारा, त्यांच्याबद्दल आदरच आहे. परंतु हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची साधी वीट देखील रचू शकलेले नाहीत, याचा देखील विचार करा’, असं अमोल कोल्हे म्हणाले. ‘सत्ता नसताना पूरग्रस्तांना मदत राष्ट्रवादीने केली आणि सत्ता असलेले विनोद तावडे डबडं वाजवून भीक मागत होते. नशीब संभाजी राजांनी त्यांना घरचा आहेर दिला’, असंही अमोल कोल्हे म्हणाले.