राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागात ही वाढ खूपच आहे. त्यामुळे राज्यातील एकूणच परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी राज्यात तीन झोन तयार करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये १५ पेक्षा अधिक रुग्ण आहेत त्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या झोनमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आल्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली असून, मागील १४ दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. मग ऑरेंज झोन कशासाठी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आमच्या जिल्ह्याचाही ग्रीन झोन मध्ये समावेश असावा. जिल्ह्यातील जनता आणि प्रशासन एकजुटीने कोरोना रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचे नितेश राणे म्हणालेत.
ऑरेंज झोनमधील जिल्हे
दरम्यान, राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि गोंदिया हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आले आहेत.
ग्रीन झोनमधील जिल्हे
दरम्यान, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी हे जिल्हे ग्रीनझोनमध्ये टाकण्यात आले आहेत.
रेड झोन
तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली या जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने हे जिल्हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा – Coronavirus : फोर्टिस रुग्णालयामधून दोन कोरोना रूग्णांना घरी सोडले