मुंबई लष्काराच्या ताब्यात जाणार असल्याची अफवा काही दिवसांपासून उठली आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. राज्यावर संकट जरी गंभीर असले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार खंबीर आहे. मुंबईत लष्काराची गरज नाही. आतापर्यंत राज्यात घेतलेला प्रत्येक निर्णय हा मी जनतेशी बोलून घेतलेला आहे. लॉकडाऊन सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने केले होते. देशातल्या जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करु द्या, कोरोनाशी लढायला आपण सर्व जवान तयार आहोत, असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लष्काराला पाचारण करण्याची शक्यता फेटाळून लावली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “कोविडशी लढण्यासाठी आपण सर्वप्रकारची खबरदारी घेतलेली आहे. बीकेसी आणि गोरेगाव येथे कोरोना प्रथमोपचार केंद्र स्थापन केलेले आहे. तसेच पुढच्या महिन्यात पावसाळा येणार असल्यामुळे आपली त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच केंद्राकडे बीपीटी, नौदल यांचे हॉस्पिटल आणि डॉक्टारांची मदत लागणार असल्याचे निवेदन दिले होते. त्यासोबतच पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आराम न करता काम करत आहेत. त्यांना विश्रांती द्यावी लागणार आहे. राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ केंद्राकडे मागावे लागेल. पण ही मागणी केली म्हणजे लष्कर बोलवले असे होत नाही”
महाराष्ट्रात लष्कराची आवश्यकता नाही हे सांगाताना ठाकरे म्हणाले की, “हा शिवरायचा महाराष्ट्र आहे. इथला प्रत्येक नागरिक शिवरायांचा मावळा आहे. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कराची गरज नाही.