टाकेद : धामणगाव येथे शेतात भात पीक सोंगणीला आलेले असताना बुधवारी (दि. २०) रोजी रात्री एका शेतातील पाच ते सहा अज्ञातांनी भाताचे शेंडे कापून टाकले. त्यामुळे सोंगणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील शेतकरी दत्तू वाघ यांचे शेतातील भात लवकरच सोंगणीला येणार होता. सकाळी शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात हे निदर्शनास आले की, शेतात पाच ते सहा अज्ञातांनी येऊन भाताचे शेंडे (गचे) कापून टाकले. त्यामुळे वाघ यांचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे तीस पोते भाताचे नुकसान झाले असल्याचे वाघ यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे व परिसरातील नागरिकांकडून या घटनेचा राग व्यक्त करण्यात आला.
अशा प्रकारे पिकांचे नुकसान करणार्या समाजकंटकाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी वाघ यांनी घोटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून सहायक पोलीस उपनिरीक्षक अनील धुमसे, पोलीस हवालदार सुहास गोसावी, पो. ह. केशव बसते आदी पुढील तपास करीत आहेत.