राज्यसभा निवडणूक : विधानसभेच्या २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनीच का केले मतदान?

राज्यसभा निवडणूक : विधानसभेच्या २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनीच का केले मतदान?

राज्यसभेच्या (Rajya Sabha elections) महाराष्ट्रातील (maharashtra) सहा जागांसाठी आज शुक्रवारी मतदान (voting) झाले. सहा जागांसाठी सात जणांनी उमेदवारी भरल्याने ही निवडणूक मोठी अटीतटीची होती. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाने मोठा जोर लावला. एक – एक मत महत्त्वाचे होते. या निवडणुकीसाठी ४ वाजता मतदान संपले.

सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजप उमेदवार धनंजय महाडीक यांच्यात चुरस आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) विधानसभेतील २८८ आमदारांपैकी (mla) २८५ आमदारांनी मतदान केले आहे.  प्रत्येक मत महत्त्वाचे असताना ३ मते कुठे गेली हा प्रश्न नक्कीच पडला असेल. ही ३ मते नक्की कुणाची होती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरूंगात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी देशमुख आणि मलिक यांनी निवडणुकीसाठी एका दिवसासाठी जामीन मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामिन देण्यास नकार दिला. त्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यासा नकार दिला. त्यामुळे देशमुख आणि  मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही.

दुसरीकडे शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. या जागेवर अद्याप पोटनिवडणूक झाली नसल्याने ही जागा रिक्त आहे. परिणामी हे एक मत कमी झाले आहे. त्यामुळे २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेच्या २८५ सदस्यांचेच राज्यसभा निवडणुकीत मतदान झाले.

 

 

First Published on: June 10, 2022 5:11 PM
Exit mobile version