मानाच्या पालख्या एसटीतूनच जाणार

मानाच्या पालख्या एसटीतूनच जाणार

प्रातिनिधीक फोटो

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला सोमवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश सोमवारी राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे.

वाखरीपासून दीड किलोमीटर पायी वारी

सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करावे लागणार आहे. मात्र, वाखरीपासून दीड किलोमीटरचे अंतर पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: June 15, 2021 1:01 AM
Exit mobile version